शशिकांत वारिशेंची हत्या ठरवून,पोलिसांचे न्यायालयात आरोपपत्र

रत्नागिरी:- राजापूरातील पेट्रोकेमिकल्स रिफायनरी (आरआरपीसीएल) प्रकल्पाविरोधात लिखाण केलेले पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या ठरवून झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. वारिशेंच्या हत्येआधी आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने एकाला फोन करून ‘आज मी याचे काम तमाम करणार’ अशी भाषा वापरल्याचे संभाषणच आंबेरकरच्या फोनमध्ये पोलिसांना सापडले.

‘महानगरी टाईम्स’ या मराठी दैनिकाचे वार्ताहर शशिकांत वारिशे यांची ६ फेब्रुवारी २०२३ ला हत्या झाली होती. पंढरीनाथ आंबेरकर याने वारिशे यांच्या दुचाकीला थार गाडीने धडक देत त्यांना चिरडल्याचा आरोप आहे. सध्या आंबेरकर खून व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांसह तुरुंगात आहे.

वारिशे यांच्या हत्येशिवाय आंबेरकरवर रिफायनरीच्या आंदोलकांना मारहाण व धमकावल्याचे आणखी चार गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये त्याने कुंभवडेतील मनोज मयेकर यालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मनोजवर नंतर कोल्हापुरात दोन आठवडे उपचार सुरू होते.
झडतीत आंबेरकरकडे पोलिसांना पेन ड्राईव्ह सापडला होता. या पेनड्राइव्हमध्ये वारिशे यांनी लिहिलेले अनेक लेख आहेत. विरोधात बातमी छापल्याबद्दल वारिशेला संपवणार, असे मराठी संभाषण असलेले फोन रेकॉर्डिंगही पोलिसांच्या हाती लागले आहे.
वारिशे यांच्या कथित हत्येच्या दोन तास आधी आंबेरकर एकाशी फोनवर बोलला होता. ‘एकाचे काम तमाम करायचे आहे (मला कुणाला तरी संपवायचे आहे). आज त्याचे काम तमाम करणार आम्ही (मी आज त्याला ठार मारेल)’, असे त्यांच्यात संभाषण झाले होते. हे कॉल रेकॉर्डिंग आंबेरकरच्या फोनमध्ये सापडले आहे, असेही पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.

वारिशे हे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामुळे शेतकर्‍यांच्या होणार्‍या नुकसानीवर सातत्याने लिखाण करायचे. मृत्युपूर्वी वारिशे यांनी आंबेरकरांच्या गुन्हेगारी कृत्यांवर प्रकाश टाकणार्‍या लेखासह त्याच्या राजकीय नेत्यांसोबतच्या बॅनर्सची छायाचित्रे प्रकाशित केली होती. त्याने वारिशे यांना त्यांच्या व बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीविरोधात न लिहिण्याची धमकीही अनेकदा दिली होती.
पोलिस आरोपपत्रानुसार, पंढरीनाथ आंबेरकर हा नियोजित रिफायनरी प्रकल्पाचा समर्थक होता. त्याने या प्रकल्पाच्या परिसरात स्वत: तसेच नातेवाईकांच्या नावे जमीन खरेदीचे व्यवहारही केले होते.
आंबेरकरने आरआरपीसीएलला लॉजिस्टिक सेवा पुरवल्या होत्या. आंबेरकरच्या मालकीच्या साई कृपा ट्रॅव्हल्सला आरआरपीसीएलने डिसेंबर २०२२ मध्ये ४.४४ लाख रुपये दिले होते, असे रत्नागिरीतील पोलिस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने सांगितले आहे.