हातखंबा येथील काजू दुकान सलग दुसऱ्यांदा फोडून 2 लाख 20 हजारांचे काजू लंपास

रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथील काजूचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा काजू चोरला. अज्ञातांनी एकाच दुकानातील 2 लाख 20 हजार 700 रुपयांच्या काजूची पाकीटे चोरून नेली आहेत. ही घटना मंगळवारी (दि.२८) आणि बुधवारी (दि.२९) घडली. गेल्या ४ ते ५ महिन्यात हे दुकान दुसऱ्यांदा फोडण्यात आले आहे.

याबाबत संदेश परशुराम दळवी (वय-४८, रा. आरोग्यमंदिर, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यानी त्यांच्या दुकानाचा पत्रा काढून दुकानातील वेगवेगळ्या वजनाच्या एकूण 1 हजार 148 किलो काजूची पाकीटे चोरट्यांनी लंपास केली. यापूर्वीही हे दुकान दोन ते तीनवेळा फोडण्यात आले असून, दुकान एकाच पद्धतीने छताचा पत्रा काढून फोडण्यात आले आहे. याप्रकरणी तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.