केवळ काही नौका समुद्रात, रिपोर्टदेखील असमाधानकारक
रत्नागिरी:- शासनाच्या आदेशानुसार मच्छीमारी बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर पोषक वातावरणाचा फायदा मोजक्याच मच्छीमारांनी घेतला. स्थानिक खलाशी उपलब्ध असलेलेच मच्छीमार समुद्रात रवाना झाले; मात्र वातावरणाचा काही नेम नाही या भितीने गिलनेटने मासेमारी करणारे मच्छीमार 15 वावात जाऊन मासेमारी करण्याच्या मानसिकतेत नव्हते. या मुहूर्ताला बांगडा, चिंगुळ, सौदाळा अशी मासळी त्यांच्या जाळ्यात सापडली होती.
शासनाने 1 जुन ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या काळासाठी मासेमारीवर बंदी घातली होती. हा मोसम पावसाळी आणि माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे मच्छीमारही मासेमारीला जात नाहीत. बंदी कालावधी संपुष्टात आला असून शनिवारी मुहुर्त साधण्याचा काहींचा मानस होता. ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारीला सुरवात होते. पर्ससिननेटद्वारे मासेमारीला 1 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मागील हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनामुळे मच्छीमारी हंगामाला फटका बसला होता. सुमारे दीड महिना मासेमारी बंद होती. शिथिलता मिळाल्यानंतर मासेमारीला सुरवात झाली असली तरीही निर्यातीसह परराज्यात मासे पाठवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे स्थानिक पातळीवर मिळणार्या दरावरच त्यांना अवलंबून रहावे लागल. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला. जुन, जुलै महिन्यातही कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्यामुळे मत्स्य हंगाम अडचणीत आला आहे. ट्रॉलिंग मासेमारीसाठी बहूतांश मच्छीमार परराज्यातील खलाशी बोलवतात. बंदी सुरु होण्यापुर्वी ते खलाशी गावी परतले. त्यांना पुन्हा आणताना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे बहुतांश मच्छीमारांची समुद्रात जाण्यासाठी तयारी झालेली नाही. त्यामुळे सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणार्या रत्नागिरीतील मिरकरवाडा येेथे शुकशुकाट होता.
शासकीय मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी निसर्गानेही साथ दिलेली आहे; परंतु ईद सणामुळे मोजक्याच लोकांनी नौका समुद्रात सोडल्या आहेत. यामध्येही ट्रॉलिंग करणार्यांची संख्या अत्यल्प असून गिलनेटद्वारे मासेमारी करणार्यांचा टक्का अधिक आहे. वरवडे येथील काही छोटे मच्छीमार सकाळच्या सत्रात समुद्रात गेले होते. त्यांना कोळंबी, बांगडा, सौदाळा यासारखी मासळी मिळाल्याचे समजते; परंतु छोटे मच्छमारही खोल समुद्रात जाण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. बंपर मासळीसाठी 15 वावाच्या पुढे जावे लागणार आहे. या कालावधीत अचानक वातावरण बिघडले तर धोका निर्माण होऊ शकतो. मासळी किनार्याकडे सरकण्याची प्रतिक्षा या छोट्या मच्छीमारांना आहे. छोटे वादळ गेले मासळी किनार्याकडे वळते. त्याचा फायदा या मच्छीमारांना होतो. निसर्गाचा रंग पाहून मासेमारीला जाणे न जाणे याचा निर्णय होणार आहे.









