रत्नागिरी:- खेड पोलिसांनी सायबर गुन्हेगारीचा पर्दाफाश करत एका ब्लॅकमेलरला मुंबईतील पवई येथून अटक केली आहे. एका तरुणीला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून, वारंवार फोन करून, ऑनलाइन पाठलाग करून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्रास देणाऱ्या तसेच इंस्टाग्रामवर तरुणीचे बनावट खाते तयार करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.
माहे नोव्हेंबर २०२४ ते २४ एप्रिल २०२५ या कालावधीत घडलेल्या या गंभीर प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५२, ३५१ (२), ३५१ (३) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ई), ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड, श्री. भागौजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन पांडुरंग भोयर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने या गुन्ह्याचा तपास हाती घेतला.
तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना, आरोपी मुंबईतील पवई परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ तपास पथकाने पवई येथे धाव घेतली आणि मोठ्या शिताफीने कृष्णकांत सुभाष वैध (वय-२८ वर्षे, रा. रूम नं. ०३, वैद्य चाळ, पोसपोली गाव, साखीविहार रोड, निती पवई) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला २८ मे २०२५ रोजी ताब्यात घेऊन २९ मे २०२५ रोजी मध्यरात्री ००.५६ वाजता अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्यासाठी वापरलेला मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे.
या कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पांडुरंग भोयर यांच्यासह पोहेकॉ दिपक गोरे, अजय कडू, पोकॉ राम नागुलवार, पोक वैभव ओहोळ आणि पोहेकॉ रमिज शेख (टेक्निकल ॲनालिसिस विंग) यांचा समावेश होता. या घटनेमुळे सायबर गुन्हेगारांना जरब बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.