साळवी स्टॉप येथे अटक केलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन फेटाळला

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरित्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहिल भोंबल (३०, रा. साळवी स्टॉप रत्नागिरी, मूळ रा. बांगलादेश) असे या महिलेचे नाव आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी तिला दहशतवाद विरोधी पथकाकडून ताब्यात घेण्यात आले होते. तिच्याविरुद्ध शहर पोलिसांत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मागील अडीच महिन्यापासून कारागृहात असलेल्या सलमा हिने जामिनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. गुन्ह्यातील माहितीनुसार सलमा ही १६ डिसेंबर २०१६ रोजी ९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. यावेळी तिचे वास्तव्य शृंगारतळी गुहागर याठिकाणी होते. यानंतर सलमा हिने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला. तसेच व्हिसाची मुदत संपली असतानाही तिने २०१७ ते २०२५ या कालावधीत अवैधरित्या भारतात वास्तव्य केले. या काळात सलमा हिने आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला आदी बनावट कागदपत्रे तयार करत भारतात वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. सलमा हिला १७ जोनवारी रोजी शहरातील साळवी स्टॉप येथून अटक करण्यात आली होती.

सलमा हिच्या वकिलांनी न्यायालयापुढे सांगितले की, आरोपी ही एक महिला आहे, पोलिसांच्या तपासकार्यात सहकार्य केले जाईल. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्थीचे पालन आरोपी हिच्याकडून केले जाईल असे सलमा हिच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले. तर सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करताना सांगण्यात आले की, आरोपी हिने केवळ भारतात अवैध वास्तव्य केले नाही, तर तिच्याकडून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. याकामी तिला अन्य कुणीतरी मदत केली असण्याची शक्यता आहे.