सात वर्षे रखडलेल्या रत्नागिरी पंचायत समिती इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी

ना. सामंत यांचा पुढाकार; 8 कोटींचा निधी मंजूर

रत्नागिरी:- मागील सात वर्षे रखडलेल्या रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्न अखेर सुटला आहे. ना. उदय सामंत यांनी पुढाकार घेतल्याने पंचायत समिती इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 8 कोटीच्या तांत्रिक मंजुरीचे आदेश बांधकाम विभागाने दिले असून लवकरच पंचायत समितीच्या इमारतीचे काम सुरु होणार आहे.
 

रत्नागिरी पंचायत समितीच्या हक्काच्या इमारतीचा प्रश्न अनेक वर्षे रखडलेलाच होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पंचायत समितीची इमारत होती. ब्रिटिश कालीन ही इमारत वापरण्यास धोकादायक झाली. मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये कारभार करणे शक्य नसल्याने रत्नागिरी पंचायत समितीचे कार्यालय स्थलांतरीत केले. जिल्हा परिषदेच्या आवारातील डीआरडीएच्या नव्या इमारतीमध्ये रत्नागिरी पंचायत समितीचे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात हलविले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुनी इमारत निर्लेखित करून नव्या इमारतीचा प्रस्ताव करण्यात अनेक अडचणी आल्या. तत्कालीन सभापती प्रकाश साळवी यांच्यासह महेश उर्फ बाबू म्हाप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पंचायत समितीच्या जागेसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर पंचायत समितीच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली.  पंचायत समितीच्या इमारतीसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली. इमारतीसाठी १ कोटी ७१ लाखाचा निधी होता. परंतु जागेचा सातबारा रत्नागिरी पंचायत समितीच्या नावावर नसल्याने निधी खर्ची टाकण्यात यश आले नाही. यात दोन वर्षांचा कालावधी गेल्याने इमारतीसाठी ३ कोटी २७ लाखांचा फेर प्रस्ताव तयार केला. जागेचा प्रश्न निकाली न निघाल्याने पंचायत समितीच्या इमारतीसाठी आलेला निधी ३४ लाख १४ हजार देवरूख पंचायत समितीच्या इमारतीसाठी वर्ग केला. या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील १६.९५ गुंठे जागा रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीसाठी देण्याचा निर्णय झाला. अल्पबचत कार्यालयासमोरील जागा देण्यात आली.
 

प्रत्यक्षात पंचायत समितीला असलेल्या अधिकाराच्या अडीच पट आराखडा झाल्याने या प्रस्तावातही त्रुटी काढण्यात आली. जानेवारी २०१९ मध्ये नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्रुटी पुर्ण करून प्रस्ताव पाठवला. मत्र या तीन मजली इमारतीमध्ये सर्व संवगार्तील अधिकारी, कर्मचाºयांची बसण्याची व्यवस्था आहे. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून पंचातय समिती सभापतींचे दालन नसल्याने प्रस्तावावर हरकत घेण्यात आली. ग्रामविकास खात्याने काढलेली त्रुटीवर उपाय शोधून हा प्रस्ताव पुन्हा मंत्रालय स्तरावर पाठवण्यात आला. 

रत्नागिरी पंचायत समितीची इमारत लवकरात लवकर उभी राहावी यासाठी नामदार सामंत यांनी विशेष प्रयत्न केले. पंचायत समितीची नवीन इमारत उभी कधी राहणार असा प्रश्‍न निर्माण झाला होता. या इमारतीचे इस्टिमेट टेंडर साठी बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आले होते मात्र, त्याला मंजुरी मिळालेली नव्हती. बुधवारी बांधकाम विभागाने रत्नागिरी पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या टेंडरला मंजुरी दिली असून त्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या इमारतीचे मार्ग मोकळा झाला असून लवकरच पंचायत समितीची नवी इमारत रत्नागिरीत उभी राहणार आहे.