सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरणात अडथळा

रत्नागिरी:- रेशन दुकानात धान्य वितरणात पुन्हा एकदा सर्व्हरचा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे. सतत धान्य वितरणात अडथळा येत असल्याने लाभार्थी आणि दुकानदारही त्रासले आहेत.सर्व्हर डाऊन असल्याने ई-पॉस मशीन अतिशय संथगतीने चालत आहेत तर कधी कधी पूर्णपणे ठप्प होतात. त्यामुळे ग्राहकांना ताटकळत थांबावे लागते आहे.अनेकदा थांबूनही ई-पॉस मशीन पुन्हा सुरू होईल याची शाश्वती नसते. अशा वेळी लाभार्थ्यांना धान्य वितरण कसे करायचे, असा प्रश्न रास्त भाव धान्य दुकानदारांना पडला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत लक्ष्यनिर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणाली मार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून (बायोमेट्रिक ओळख पटवून) धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे धान्य वितरणात अडथळे येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे.ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या रोषाला मात्र दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने तांत्रिक अडचणी दूर होत नाही तोवर ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पॉस मशीन अपडेट झाल्यानंतर ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या येत आहेत. मात्र, या संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच तांत्रिक अडचणी दूर होतील अशी अपेक्षा आहे असे शासन स्तरावरून सांगण्यात येते आहे.