Friday, August 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी समुद्रात मासेमारी करताना खलाशाचा मृत्यू

समुद्रात मासेमारी करताना खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ‘पुष्पगंधा’ या मच्छीमारी बोटीवरील एका खलाशाची अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मण पांडुरंग डावकुरे (वय ६५, रा. पूर्णगड, ता. जि. रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (ता. १९) सकाळी नऊच्या सुमारास घडली. ‘पुष्पगंधा’ ही मच्छीमारी बोट मिरकरवाडा बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. या बोटीवर लक्ष्मण डावकुरे हे खलाशी म्हणून काम करीत होते. त्यांच्यासह बोटीवरील अन्य खलाशी मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. मासेमारी सुरू असताना लक्ष्मण डावकुरे यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना चक्कर आल्याने ते बोटीवर पडले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे बोटीवरील इतरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे बोटीवरील खलाशांनी तातडीने त्यांना मिरकरवाडा बंदरात आणले. बंदरात आल्यानंतर डावकुरे यांना खासगी वाहनाने उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष्मण डावकुरे यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.