समुद्रात दोन नॉटीकल मैल अंतरावर अकरा मीटर खोलीत आढळले नावेद-2 चे अवशेष?

रत्नागिरी:- जयगड येथील बेपत्ता झालेल्या नावेद- २ नौकेचे अवशेष शोधण्यासाठी मालकासह स्थानिक मच्छीमारांनी स्कुबा डायर्व्हस्ची मदत घेतली. त्यात समुद्रात तळात एक मच्छीमारी नौका रुतल्याचे आढळून आले आहे. समुद्रात दोन नॉटीकल मैल अंतरावर अकरा मीटर खोलीत ती नौका दिसल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे. त्यामुळे शासनाकडून त्या जागेची चाचपणी होणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

नासीर हुसेनमिया संसारे (वय ५२, रा. जयगड, अकबर मोहल्ला) यांनी नावेद २ ही नौका बेपत्ता झाल्याची तक्रार २६ ऑक्टोबरला जयगड पोलिस ठाण्यात केली होती. नावेद या नौकेला खासगी कंपनीच्या मालवाहू जहाजाने धडक दिल्याचे तक्रारीत नमुद केले होते. त्याला अनुसरुन ‘फतेहगड’ या जहाजावरील कप्तानाकडून मध्यरात्रीच्या सुमारास एखादी वस्तू तरंगत जहाजावर धडकल्याचा संदेश बंदरावर पाठविण्यात आला होता. हा प्रकार दोन नॉटीकल मैल अंतरावर घडल्याची नोंद झाली. याच परिसरात नावेदवरील नांगर आणि जाळी काही मच्छीमारांना सापडली. नौका बेपत्ता प्रकरणी फतेहगड जहाजावर गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई जयगड पोलिसांमार्फत सुरु आहे.

या प्रकरणामुळे प्रशासनाकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याने मच्छीमारांनी स्वतःहून शोध मोहीम हाती घेतली होती. काही दिवसांपुर्वी लंगर सापडलेल्या भागात गुरुवारी (ता. ९) खासगी स्कुबा डायर्व्हस्ना पाण्यात उतरवण्यात आले. सकाळी १० वाजता ही शोध मोहीम सुरु झाली. यामध्ये चार जणं सहभागी झाले होते. किनार्‍यापासून एक तासाच्या अंंतरावर आतमध्ये साधारणपणे दोन नॉटीकल मैलात शोध पथक उतरवण्यात आले होते. त्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी नावेदचे मालक श्री. संसारे यांना मदत केली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ही मोहीम सुरु होती. समुद्राच्या तळात एक नौका अडकुन असल्याचे स्कुबा डायर्व्हस् ना आढळल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली. मालवाहू जहाजाला धडकल्यामुळे ती वाळूत रुतली असावी असा अंदाजही मच्छीमारांनी वर्तविला आहे. स्कुबा डायव्हर्स्कडून मिळालेली माहिती मच्छीमारांनी पोलीसांना देण्यात आली आहे. वाळूत असलेले अवशेष नावेदचेच आहेत का याबाबत पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांकडून कोणती पावले उचलली जाणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

जयगड बंदरामध्ये भविष्यात दुर्घटना घडू नये याबाबत चर्चा करण्यासाठी जयगड परिसरातील मच्छीमारांची बैठक उद्या (ता. 10) होण्याची शक्यता आहे. मालवाहू जहाजे दिलेला चॅनेल सोडून बंदरात येत असल्याचे जयगड येथील मच्छीमारांचे मत आहे. तसेच नावेद या बेपत्ता नौकेचा शोध घेण्यासाठी कडक पावले उचलली जावीत अशी मागणी केली जाणार आहे.
दरम्यान, स्थानिक मच्छीमारांकडून शोध मोहीम करणार्‍या सर्वच शासकीय यंत्रणांबाबत तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. योग्य पध्दतीने सहकार्य मिळत नसल्यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या बदल्या कराव्यात, अशी भुमिका मच्छीमारांनी घेतली आहे.