संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर नियोजन: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट संपवण्यासाठी पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी आरोग्यासह सर्व यंत्रणांची मिळून वॉर रुम तयार करुन समन्वय साधला जाणार आहे. जिल्ह्यात 10 हजारपर्यत टेस्टिंग वाढवले जाणार असून सुपर स्प्रेडर ठरु शकणार्‍यांसह पर्यटक व गावी येणार्‍यांचे नाक्यांवर टेस्टिंग सुरु केले जाणार आहे. सर्वानी मिळून तिसरी लाट दूर ठेवू असे नुतन जिल्हाधिकारी डॉ. एन. बी. पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट गेल्या काही दिवसापासून कमी झाला आहे. मात्र दुसरी लाट संपवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या ठिकाणी आरोग्य विभागासह सर्व विभागांचा समन्वय असला तरी तो अधिक चांगला होण्यासाठी वॉर रुम तयार केली जाणार आहे.

सद्यस्थितीत पॉझिटिव्ह सापडणार्‍या व्यक्‍तीच्या संपर्कातील लोकांचीच टेस्ट केली जाते. परंतु यातून सुटलेले पॉझिटिव्ह ठरत असतात. त्यामुळे टेस्टिंग पुन्हा एकदा वाढवले जाणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींचीही मदत घेतली जाणार आहे. दररोज दहा हजार टेस्टिंगचे उद्दिष्ठ ठेवले जाणार आहे.  यात आरटीपीसीआर 60 टक्के तर अ‍ॅन्टीजेन 40 टक्के टेस्ट केल्या जाणार आहेत.  सद्य परिस्थितीत लक्षणे नसलेले रुग्ण सापडत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. अशा व्यक्‍ति सापडल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. चाचणी करतानाही हायरिस्क व लोरिस्क असे भाग केले जाणार आहेत. चाचण्यांचे रिपोर्ट लवकर मिळावेत यासाठी जिल्हा रुग्णालयाची क्षमता एक हजारवरुन अडीच हजार चाचण्यांपर्यत वाढवली जाणार आहे. त्याचप्रमाणे डेरवण कॉलेजमध्येही टेस्टिंगची सुविधा आहे. यासाठी शासनाकडून परवानगी घेऊन त्याठिकाणीही टेस्टिंग सुरु करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.

मालेगाव कोरोनामुक्‍त करण्यात आले, त्याधर्तीवर ग्रामीण भागामध्ये मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त गावे कोरोनामुक्‍त झाल्यास शासनाच्या स्पर्धेत ती उतरु शकणार आहेत.यासाठी जनजागृती केली जाणार आहे. संभाव्य रुग्ण ओळखत औषधोपचार झाल्यास कोरोना आटोक्यात आणणे शक्य असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जास्तीतजास्त डोस मिळावे म्हणून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास तिसरी लाट दूर ठेवण्यात यश येईल असेही त्यांनी सांगितले. जिल्हा सध्या चौथ्या टप्प्यात असून नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सुपर स्प्रेडर ठरणार्‍यांची तपासणी वारंवार करणे गरजेचे आहे. पर्यटकांसह बाहेरुन येणार्‍यांची चेकनाक्यांवर टेस्टिंग करणे बंधनकारक केले जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात आठ एमआयडीसीतील साडेसहाशे छोटेमोठे उद्योग सुरु आहेत. त्यामध्ये साडेआठ हजार कामगार कार्यरत आहेत. यातील साडेसात हजार कामगारांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सात हजारजणांची कोरोना टेस्टही झाली आहे. एमआयडीसीमधून कोरोना उद्रेक होऊ नये यासाठी मालवाहतूक करणार्‍यांना बबल सिस्टीम सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कामगारांचीही वेळोवेळी टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरी शहर व चिपळूण शहरामध्ये बाहेरुन येणार्‍यांची संख्या अधिक असल्याने  शहरात व परिसरात रुग्णांची संख्या अधिक असल्याचे डॉ. पाटील यांनी मान्य केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात अद्याप एकही शाळा सुरु झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यटन प्लॅन तयार करणे आवश्यक
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. कोस्टल व नॉन कोस्टल असे दोन प्रकारचे पर्यटन या ठिकाणी विकसित होऊ शकते. पर्यटक या ठिकाणी थांबावा त्यादृष्टीने सुविधा निर्माण करायला हव्यात. शेती पर्यटन, साहसी पर्यटनाला वाव मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्लॅन तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. पर्यटनातून रत्नागिरीचा जीडीपी वाढवा अशी धोरणे लवकरच राबवली जातील असे जिल्हाधिकारी डॉ. एन. बी. पाटील यांनी सांगितले.