मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जबाबदारीची जाणीव; नातेवाइकांकडून कौतुक
रत्नागिरी:- कार्यालयीन कर्मचारी संपावर गेले तर वेळ निभावून निघते; परंतु आरोग्य विभागातील कर्मचारी संपावर गेले तर रुग्णांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहू शकतो. संपूर्ण महाराष्ट्रत जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी कालपासून संप सुरू आहे; परंतु महाराष्ट्रात ज्या मनोरुग्णालयाची चांगल्या सेवेबद्दल ख्याती आहे त्याच रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांना जबाबदारीची जाणीव असल्याचे दाखवून दिले आहेत. संपकाळात देखील मनोरुग्णालयाची कर्मचाऱ्यांनी संघटनांच्या दबावाला झुगारून रुग्णांना अखंडित सेवा दिली आहे. त्यांच्या या सेवेबद्दल कौतुक होत आहे.
राज्यभरात कालपासून शासकीय, निमशासकीय, आरोग्य, शिक्षक आदींच्या संघटना कालपासून बेमुदत संपावर आहे. त्यामुळे संपूर्ण शासकीय कामे ठप्प झाली आहेत. एखादवेळेस कार्यालयीन कर्मचारी संपावर गेले तर वेळ निघून जाते; पण आरोग्य विभागातील कर्मचारी संपावर गेल्यास रुग्णांच्या जीवनमरणाचा प्रश्न उद्भवू शकतो. याचे भान असल्याने मनोरुग्णालयातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी आज संपकाळात देखील रत्नागिरी येथील मनोरुग्णालयाची सेवा अखंडित सुरू ठेवली. कालपासून राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत; मात्र आपली जबाबदारी ओळखत प्रदेशिक मनोरुग्णालयातील ७८ पैकी ५४ कर्मचारी संघटनांचा दबाव झुगारून कामावर हजर झाले.
मनोरुग्नालयात परिस्थितीच तशी आहे. कर्मचारी नसतील तर येथे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. येथील रुग्ण हे कधीही आक्रमक होऊ शकतात किंवा त्यांचे मानसिक संतुलन बिघडू शकते. हे सर्व हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असणे आवश्यक असते. आपली हीच जबादारी ओळखत येथील ५४ कर्मचारी हे संपात सहभागी झाले नाहीत. आज या रुग्णालयात २११ रुग्ण उपचार घेत आहेत. यात ७० महिलांचा देखील समावेश आहे. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरातील ५ कर्मचारी जरी संपावर गेले तरी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या सर्व गोष्टींचे भान ठेवत आज ५४ कर्मचारी कामावर हजर झाल्याने मनोरुग्णालयातील सेवा सुरळीत सुरू आहे. या कर्मचाऱ्यांनी ती विस्कळीत होऊन दिली नाही.