पाली बाजारपेठेतील घटना
रत्नागिरी:- पूर्व वैमनस्यातून एकाला लोखंडी स्टूल आणि लोखंडी पान्याने मारहाण केल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शुक्रवार 5 जून रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास पाली बाजारपेठेत घडली आहे.
प्रसाद प्रभाकर जाधव,अमोल अशोक जाधव (दोन्ही रा.वेरळ बौध्दवाडी लांजा,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात जनार्दन गौतम जाधव (36,रा.सध्या रा.अंधेरी आंबोली मुळ रा.वेरळ लांजा,रत्नागिरी) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवार 3 जून रोजी वेरळ गावी त्याच्या घराचे बांधकाम चालू असल्याने तो
त्याठिकाणी आला होता.सायंकाळी 7.30 वा. दरम्यान वेरळ एसटी स्टॉप येथे तो उभा असताना त्याच्या वाडीतील प्रभाकर जाधवने तिथे येउन पूर्ववैमनस्यातून फिर्यादीला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने फिर्यादीने घरी जाउन कोयती आणली व प्रभाकर जाधवला एसटी स्टॉपवर कोयतीने हातावर,पायावर मारहाण करुन तेथून पळ काढला.
पळ काढल्यानंतर आपल्याला काहीजण शोधत असल्याची कल्पना फिर्यादीला आल्याने तो अंजणारी एसटी स्टॉपच्या पाठीमागील बाजूस लपला होता. दरम्यान,3 जून पासून काहीही न खाल्याने तो 5 जून रोजी दुपारी अंजणारी येथून एसटीने 2.30 वा. पाली एसटी स्टॉप येथे आला. त्याठिकाणी काहीतरी खाउन लांजा पोलिस ठाण्यात हजर होण्याचे त्यांनी ठरवले होते. त्याचवेळी संशयित प्रसाद जाधव आणि अमोल जाधव यांनी फिर्यादीला पाहिले. फिर्यादी पळू लागल्यावर प्रसाद जाधवने त्याचा पाठलाग करत बाजुच्या गॅरेजमधील लोखंडी स्टूल उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारले. तर संशयित अमोल जाधवने तेथील पाना घेउन तो फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर मारुन दुखापत केली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.









