विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ

खेड:- खेड तालुक्यातील भोसते गावातून खेड शहराकडे विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या एका स्कूल बसचा ब्रेक फेल झाला. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे भीषण अपघात होता होता वाचला. सुमारे २० ते २५ शालेय विद्यार्थ्यांचा जीव वाचल्याने परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. खेड शहरातील जगबुडी नदीच्या किनारी हा मोठा अनर्थ टळल्याने “देव तारी त्याला कोण मारी” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसते गावातून निघालेली स्कूल बस खेड शहराकडे येत असताना अचानक तिचा ब्रेक फेल झाला. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तिथे मोठा उतार होता. तसेच समोरच विद्युत महामंडळाचा एक मोठा ट्रान्सफॉर्मर आणि शेजारी भोसते पूल होता. या पुलावरून दुचाकी, तीनचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते.

ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने जराही वेळ न घालवता आपले कौशल्य पणाला लावले. त्याने प्रसंगावधान दाखवत बस तात्काळ एका बाजूला वळवली आणि झाडीमध्ये अडकवली. यामुळे बसची गती कमी झाली आणि ती थांबली. जर चालकाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता, तर बसची पुलावरून येणाऱ्या वाहनांना धडक बसली असती आणि मोठा अपघात घडला असता, असे प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकात चर्चा आहे.

या स्कूल बसमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते. चालकाच्या या धाडसी निर्णयामुळे आणि समयसूचकतेमुळे सर्व विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सर्वजण सुखरूप असल्याचे कळताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. चालकाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.