रत्नागिरी:- नवी मुंबईतील वाशी बाजार समितीमध्ये कोकणातील हापूस आंब्याची एंट्री झाली आहे. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि श्रीवर्धन येथून सुमारे 380 पेट्या दाखल झाल्या. मंगळवारी (ता. 30) शंभर पेटी आल्याचे तेथील व्यावसायिकांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक पेट्या देवगडमधील असून त्या पोठपाठ रत्नागिरी, दापोली, बाणकोटमधील पेट्या आहेत. चार व पाच डझनच्या पेटीला 6 ते 11 हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
यंदा सुरवातीला हापूससाठी पोषक वातावरण होते; मात्र जानेवारी महिन्यात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लागलेल्या मोहोरामधील उत्पादन कमी येत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला रत्नागिरीमधून पहिली पेटी वाशी बाजारात रवाना झाली. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून सोमवारी एकाच दिवशी 40 हून अधिक पेट्या पाठवण्यात आल्या आहेत. बाणकोट आणि श्रीवर्धनमधूनही आंबा पाठवला जात आहे. दापोली, संगमेश्वर, राजापूरमधून किरकोळ आंबा वाशीमध्ये जात आहे. सर्वाधिक देवगडमधून सुमारे 250 पेटी आंबा सोमवारी बाजारात पोचला. रत्नागिरी जिल्ह्यातून पेट्यांचे प्रमाण कमी असले तरीही 15 फेब्रुवारीनंतर यामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा वाशीमधील व्यावसायिक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सध्या कोकणातून किरकोळ हापूस येत आहे. त्याची विक्री सुरू आहे. दरही चांगला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांचे प्रमाण तुलनेत खूप कमी आहे. 30 जानेवारीपूर्वी पंधरा दिवसात सर्व मिळून दोनशे पेटी हापूस कोकणातून आला होता.
याबाबत रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील आंबा बागायतदार रूपेश शितप म्हणाले, सुरवातीच्या टप्प्यातील मोहोरामधून किरकोळ उत्पादन सध्या मिळत आहे. मधल्या कालावधीत दुबार मोहोर आल्यामुळे सुरवातीची कैरी गळून गेली. सध्या चार ते पाच पेटी आंबा मिळतो. तो काढून वाशी बाजारात पाठवण्यात येत आहे. हा आंबा अजून पंधरा दिवस मिळेल. त्यानंतर पुन्हा मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात पेट्या बाजारात जाण्यास सुरवात होईल.









