रत्नागिरी:- गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी सोमवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.
मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच कोकणच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालचा उपसागर ते मध्य प्रदेशाचा परिसर, जबलपूर, कोर्बा या भागात मॉन्सूनचा आस असलेला पट्टा कार्यरत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकणच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.