वशिष्टी नदीवरील पुलाला भगदाड; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

चिपळूण:- मुसळधार कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण शहराला शुक्रवारी पुन्हा दणका दिला असून मुंबई गोवा महामार्गावरील वशिष्टी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. यामुळे मुंबई गोवा हायवे पूर्णतः ठप्प झाला आहे.

आज पहाटे हा प्रकार घडला असून पुलाच्या मधोमध असलेला काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे. याठिकाणी उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेले दोन दिवस या पुलावरून पाच ते सहा फूट उंचीवरून पाणी सतत वेगाने वाहत होते हा पूल ब्रिटिशकालीन होता. नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू होती. आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला. परंतु आज पहाटेच्या सुमाराला या पुलाचा काही भाग वाहून गेला त्यामुळे पुलाला मोठे भगदाड पडल्यासारखे दृश्य आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील हा पूल महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाच्या दुरुस्तीला आता किती काळ लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पुन्हा केव्हा सुरु होईल हे सांगणे कठीण आहे.