लांबलेल्या पावसाने आंबा हंगाम देखील लांबणीवर 

रत्नागिरी:- नोव्हेंबर थंडीऐवजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडणार आहे. मोहोर येण्यास अनुकूल असलेल्या झाडांना पुन्हा पालवी फुटण्याची भिती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. तर काही ठिकाणी कलमांना आलेला मोहोर पावसामुळे गळून जाणार आहे.

ऑक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरवातीला मुसळधार पाऊसही झाला आहे. या कालवधीत उष्णतेची आवश्यकता असते. पण पाऊस पडल्यामुळे झाडांच्या मुळांना पाणी मिळाले. त्यामुळे जी झाडे मोहोर टाकायला अनुकुल होती, त्यांना आता पालवी येईल. त्याचा आंबा हंगामावर परिणाम होणार असून गतवर्षीप्रमाणेच स्थिती निर्माण होणार आहे. या कालावधी सर्वसाधारणपणे फवारणीला सुरवात होते; परंतु जोपर्यंत पाऊस थांबत नाही, तोपर्यंत किटकनाशकांची फवारणी केली जात नाही. फवारणीवर पाऊस पडला तर औषध वाया जाते आणि खर्चही अधिक होतो. औषधाचा प्रभाव होत नाही. बागांमध्ये किंवा शेजारच्या मोकळ्या माळरानात पावसामुळे गवत वाढते. त्यामुळे कलमांवर मुंगी, तुडतुडे यासारखे किटक येतात आणि पालवी, मोहोराला बाधा पोचवतात. मोहोराला किड लागली तर तो खराब होऊन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. झाडांच्या आकारमानानुसार पाण्यामध्ये टाकुन किटकनाशकांचा वापर केला जातो. 20 लीटर पाण्यात 10 मिली किटकनाशकं असे साधारण प्रमाण असते. उन पडायला सुरवात झाली की फवारणीला सुरवात होते. पंधरा दिवसांनी मोहोर येणे अपेक्षित आहे. मोहोर तिन वेळा येतो. नोव्हेंबरच्या अखेरीस मोहोर आला तर त्यातून महिन्याभरात कणी बाहेर येते. पुढे 120 दिवसात आंबा तयार होतो. पुढे डिसेंबर, जानेवारीला येणार्‍या मोहोरातून कणी (बारीक कैरी) लवकर येते. त्याची वाढ होण्यासाठी आणि आंबा तयार होण्यासाठी सर्वसाधारण 80 ते 90 दिवस लागतात. त्यासाठी अनुकूल वातावरणही अपेक्षित आहे.