रत्नागिरी:- लांजा शहर विकास आराखड्यात लोकांना आवश्यक बदल करण्यात येतील ही आपली पहिल्यापासूनची भूमिका असून, भविष्यात लांजा शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा आराखडा महत्वाचा आहे. मात्र काही लोकांना यात राजकारण करायचे असल्याचे मत लांजा-राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी व्यक्त केले.
लांजा शहर विकास आराखड्याला गेल्या काही दिवसांपासून विरोध होत आहे. काही लोकांचा या आराखड्याला पाठिंबाही आहे. लांजा शहर आराखडा प्रसिध्द झाला त्यावेळी समन्वयाची बैठकही झाली. त्यावेळी लांजा मुख्याधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. काहींनी समन्वयाची भूमिका घेतली होती. यावेळी काहींनी विरोधाची भूमिका घेतली होती. परंतु हा आराखडा रद्द होणार नाही. त्यामध्ये नागरिकांनी आवश्यक ते बदल सुचवावेत, त्याप्रमाणे त्यात बदल करण्यात येईल असेही आ. किरण सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काहीजण यात राजकारण करीत असून, काहींनी आंदोलनही केले. काही मंडळी भाजपाचे नेते आणि नामदार नितेश राणे यांनाही भेटले. आपणही नितेश राणे यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचीही भूमिका आरखडा नको अशी नसेल. या आरखड्यामुळे कुणाचे नुकसान होणार नाही. फुकट जागा कुणाची घेतली जाणार नाही. त्याचा योग्य मोबदला दिला जाईल. हा आराखडा मागील दोन वर्षापूर्वी प्रसिध्द होणे आवश्यक होते. मात्र तो झाला नाही. मात्र हा आराखडा झाल्यास लांजाच्या भविष्यातील विकासाला महत्वाची दिशा देणार असेल असेही त्यांनी सांगितले.
लांजा-राजापूरमध्ये औद्योगिकरण होणे आवश्यक आहे. विकासाच्या दृष्टीने हे तालुके मागे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून या ठिकाणी इलेक्ट्रीकल व्हेईलकल कारखाना आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचप्रमाणे येथील बंदराचा विकासही केला जात आहे. यापूर्वी प्रकल्पाला विरोध करणार्या लोकांशी आपण चर्चा केली असून जवळपास साडेसहा हजार हेक्टर जागेवर हे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
युवा पिढीच्या हाताला याच ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वाटद भागात प्रदूषण विरहीत प्रकल्प येणे आवश्यक आहेत. त्याठिकाणी डिफेन्स, ड्रोन आणि सोलर बॅटरीचे प्रकल्प येणार असून, स्थानिकांनाच या ठिकाणी उद्योगात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले.
पाणी, शाळा, आरोग्य, वीज आणि औद्योगिकरण हे आपले मतदार संघातील विकासाचे टार्गेट आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी कबुल केले आहे की लांजा राजापूरसाठी काहीतरी स्पेशल देऊ त्यादृष्टीने लवकरच याबाबत निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची भूमिका किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सांगितले. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, शिवसेनेच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच बैठका घेऊन निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.