रेल्वेत चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर प्रवासा दरम्यान प्रवाशांच्या वस्तूंची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे.

रेल्वे प्रवासात दरम्यान १२ जून रोजी चोरी झाल्याची फिर्याद शहर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली हाती. या फिर्यादीनुसार एकूण १५ हजार ४९९ इतक्या किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. तसेच
राजापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक ३० जून रोजी एकूण ₹ 20,000/- किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. हे दोन्ही गुन्हे रेल्वे प्रवासा दरम्याने घडलेले असल्याने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे प्रवासा दरम्याने घडलेल्या सर्व चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला व सर्व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या.

या सूचनांच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परबकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत समांतर तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे वरील नमूद दोन्ही गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यात आला. या गुन्ह्या प्रकरणी आरोपी दिनेश कुमार ओमप्रकाश ( 27 वर्षे, रा. छर्पिया, पोस्ट महुवार, रुर्धेली खुर्द, जि. बस्ती, राज्य उत्तर प्रदेश) याला दिनांक २४ सप्टेंबर रोजी मडगाव, गोवा राज्यातून अटक करण्यात आली आहे. दिनेश कुमार ओमप्रकाश याने वरील नमूद दोन्ही गुन्हे आपण स्वतः केले असल्याची कबुली दिली आहे. तसेच त्याच्या कडून ३९ हजार २०० रुपये किंमतीचे चार मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत व दोन्ही गुन्ह्यांतील पूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत रेल्वे प्रवासा दरम्याने चोरीच्या गुन्ह्यांमधील आतापर्यंत एकूण ६६ हजार ६९९ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच आरोपी दिनेश कुमार ओमप्रकाश याने रेल्वे प्रवासा दरम्यान आणखी चोरीचे गुन्हे केले आहेत का? याचा अधिक तपास सुरू आहे.