Saturday, May 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून नागरिक त्रस्त; तात्काळ दुरुस्तीची मागणी

रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून नागरिक त्रस्त; तात्काळ दुरुस्तीची मागणी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहेत. शहरातील विविध भागांतील रस्ते, विशेषतः गणपती मंदिर, मुरलीधर मंदिर, बदर रोड, भुते नाका, माडवी ते घुडेदाळ, घुडेदाळ ते जवळस्तंभ, जवळस्तंभ ते भादये पूल, सन्मित्र नगर, राम माळी, मारुतीची आळी, बस स्टँड, किल्ला भांबेश्वर मंदिर ते राजवाडी भगवती बंदर या भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची कामे होणे अपेक्षित असताना, ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. या समस्येकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

माजी नगराध्यक्ष मिलिंद कृष्णकांत कीर आणि इतर नगरसेवकांनी मुख्याधिकारी, रत्नागिरी नगर परिषद यांना पत्र लिहून खड्डेमय रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. त्यांनी रस्त्यांची दुरुस्ती वेळेत न झाल्यास नागरिकांना गंभीर दुखापतींचा धोका असल्याचे म्हटले आहे. नागरिकांना या त्रासातून लवकरात लवकर दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.