रत्नागिरी:- महाराष्ट्रात उद्योजकांना गतिमान पायाभूत सुविधा देता याव्यात यासाठी पाचशे कोटीचा निधी देण्यात आला. स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी नवे उद्योग येणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योजकांना उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. मोठ्या उद्योजकांना रत्नागिरीत सहज येता यावे यासाठी महिनाभरात रत्नागिरी विनमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी केली.
रत्नागिरी एमआयडीचीच्या नूतन विश्रमगृह व जुन्या वर्तुळाकार विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलत होते. एमआयडीसीला कनेक्ट करणारी जी गावे आहेत. त्यांचे रस्ते केले जाणार आहेत. रत्नागिरीमध्ये शिरगाव, मिरजोळे, नाचणे, निवसर ग्रामपंचायतीमधील रस्ते हे एमआयडीसीला कनेक्ट केले जाणार आहेत. यासाठी 31 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
चिपळूणातील खेर्डीसाठी दोन कोटी, लोटेसाठी दीड कोटीचा निधी देण्यात येणार आहे. रत्नागिरी एमआयडीसीतील उद्योजकांना रस्त्यांचा प्रश्न भेडसावू नये यासाठी 13 कोटीचा निधी देण्यात आला असून निविदा प्रक्रियाही झ्ााली आहे. उद्योगमंत्री म्हणून काम करताना, रत्नागिरीमध्ये एखादी बैठक घ्यावी लागते, कधी उद्योजकांना बैठकांचे आयोजन करावे लागते. त्यासाठी सेवनस्टार दर्जाचे नुतन विश्रामगृह उभारण्यात येत असून त्याचाच पायाभरणी समारंभ करण्यात आला. वर्षभरात हे विश्रामगृह उभे राहील असे ना. सामंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे 39 वर्षापूर्वीच्या सर्कल रेस्टहाऊसचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी साडेतीन कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. हे कामही वर्षभरात होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी उद्योजक व उद्योजक संघटना प्रतिनिधींनाही खडे बोल सुनावताना, उद्योजकांनीही स्थानिकांना संधी द्यायला हवी. कौशल्य विकासचे विविध उपक्रम रत्नागिरीसह जिल्ह्यात सुरु झ्ााले आहेत. उद्योजकांना नेमके काय हवे याबाबत त्यांनी चर्चा केल्यास तसे कोर्स उपलब्ध करुन देता येतील असेही ना. सामंत यांनी सांगितले. रायगडमध्ये एका उद्योगासाठी कोरियातून कामगार आणण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
गेली अनेक वर्ष एमआयडीसीतील 88 कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र कोणीच यावर निर्णय घेतला नाही. मात्र आपण त्यांना अस्थापनेवर कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अद्यादेश दोन दिवसात निघेल असेही ना.सामंत यांनी सांगितले.
अनेकजण माझ्यावर टिका करतात की मी काहीही सांगतो, लोकांना फसवतो, परंतु युवा पिढीला काय हवे, भविष्यात काय लागणार आहे याचा विचार करुन ते देण्यासाठी धडपडत असतो. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना सगळ्या प्रकारची कॉलेज आपल्या मतदार संघात पाहिजेत यासाठी आपला प्रयत्न होता. आज शासकीय इंजिनिअरींग कॉलेज सुरु झ्ााले आहे. बीफार्मसी, संस्कृत उपकेंद्र सुरु झ्ााले आहे. मेडीकल कॉलेज सुरु होणार आहे. येथील गरीब विद्यार्थ्यांनी याच ठिकाणी शिकावे, बाहेरुन विद्यार्थ्यांनी यावे यासाठी आपला प्रयत्न होता, त्याबद्दल मी नक्कीच समाधानी असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. इंजिनिअरींग कॉलेजसाठी दीडशे कोटीची इमारत उभी रहात असून महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट इमारत असेल असेही त्यांनी सांगितले.
या र्काक्रमाला एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. एम. देवेंदर सिंह, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, मुख्य अभियंता कोकण विभागाचे श्री. भांदेकर, मरिनर दिलीप भाटकर, डॉ. प्रशांत पटवर्धन, जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, मिरजोळे सरपंच गजानन गुरव, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, उपकार्यकारी अभियंता बी. एन. पाटील यांच्यासह उद्योजक, कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.