एकूण ५ हजार ७६३ मते नोटाला; मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारले
रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुवाँ उडवत महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर बाजी मारली. तालुक्यात एकूण २ लाख ४ हजार ४९६ मतदार आहेत. त्यापैकी ५८ टक्के म्हणजे सुमारे १ लाख १८ हजार ६०८ एवढे मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदानापैकी ५ हजार ७५३ मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारत नोटाला मतदान केले. यात सर्वांत जास्त नाचणे गटामध्ये ३९९ तर हातखंबा गणामध्ये ३६० जणांनी नकारात्मक मतदान केले. म्हणजे एकूण झालेल्या मतदानाच्या सुमारे पाच टक्के मतदारांनी उमेदवारांना नाकारल्याचे स्पष्ट होत आहे.
ग्रामीण भागाच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. तालुक्यात २७१ मतदान केंद्रांवर २ लाख ४ हजार ४९६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते; परंतु एकूण ५८ टक्के मतदान झाले. म्हणजे १ लाख १८ हजार ६०८ मतदान झाले. १० जिल्हा परिषद गटासाठी २६ उमेदवार तर २० गणासाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भयपणे पार पडली. यामध्ये हातखंबा गटामध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली. गोळप गटामध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विरूद्ध शिवसेना यांच्यात जोरदार लढत झाली.
निकालानंतर १० गट आणि २० गणामधील सर्वच्या सर्व जागा शिवसेना शिंदेगटाने घेतल्या. त्यामधये फक्त २ गण भाजपला सोडण्यात आले होते. ते देखील भाजपने जिंकले. गट आणि गणनिहाय मतदानाची झालेली आकडेवारी पाहिली तर नकारात्मक म्हणजे नोटा मतदानाचा अनेकांनी वापर केल्याचे स्पष्ट होत आहे. दहा गटांपैकी सर्वांत कमी वाटद गटामध्ये १६५ नोटाला मतदान झाले तर सर्वांत जास्त नाचणे गटामध्ये ३९९ नोटाला मतदान झाले आहे. २० गणापैकी सर्वांत कमी पावस गणामध्ये ९४ मतदारांनी तर सर्वांत जास्त हातखंबा गणात ३६० मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे.









