रत्नागिरीत ४ मार्चला हिंदू जन आक्रोश मोर्चा

रत्नागिरी:- सोमवार ४ मार्च रोजी सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ड्रग्समुक्त रत्नागिरी, भूमी अतिक्रमण , लव्ह जिहादमुक्त रत्नागिरी असा नारा यावेळी देण्यात येणार आहे . हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता शिवतीर्थ , मारुती मंदिर येथून चालू होणार आहे . जयस्तंभ येथे प्रमुख वक्त्या काजल हिंदुस्थानी मार्गदर्शन करतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देऊन समारोप होईल.

२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सकल हिंदू समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . या बैठकीला सकल हिंदू समाजाचे ८० प्रतिनिधी उपस्थित होते . या मोर्चाला जास्तीत जास्त हिंदू उपस्थित राहतील , याचे नियोजन करण्यात येत आहे . बैठका , हँडबिल , भित्तीपत्रके , बॅनर , रिक्षा अनाऊन्समेंट तसेच प्रसारमाध्यमाच्या मदतीने या मोर्चाचा प्रसार करण्याचे ठरले . प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हिंदूंच्या संघटित शक्तीचे प्रदर्शन रत्नागिरीत करावेच लागेल , असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला . रत्नागिरीत शासकीय ग्रंथालयाच्या जागेत असणारे अनधिकृत बांधकाम जिल्हधिकाऱ्यांनी पाडण्याचे आदेश दिले असताना प्रशासन टाळाटाळ का करते ?, राजापूर पन्हळे येथे अनधिकृत बांधकाम सुरू आहे . शिरगांव , आडी येथेही भूमी अतिक्रमण सुरू आहे . रत्नदुर्ग किल्ल्यावर रेखांकन करून सरकारी भूमीवर अतिक्रमण केले आहे . हिंदूंच्या जमिनी बळकावणारे विभागिय वक्फ बोर्डास रत्नागिरीत मान्यता का दिली जाते , याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे . या मोर्चात सर्व हिंदू बांधवानी , माता , भगिनींनी आपले राष्ट्र आणि धर्म कर्तव्य समजुन बहुसंख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन सकल हिंदू समाजाने केले आहे.