रत्नागिरी:- ड्रग्ज विळखा जिल्ह्यात वाढत असून, ड्रग्ज विक्री करणार्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यातील सातजणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस दलाला दिल्या असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक ना. उदय सामंत यांनी घेतली. यावेळी पोलिस दलाला ड्रग्जबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या नंतर पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती देताना सांगितले की, राज्यासह जिल्ह्यातही ड्रग्जचा विळखा वाढत आहे. तरुण पिढी यात मोठ्या प्रमाणात गुरफटत असल्याचे दिसून येत आहे. ड्रग्जविरोधात पोलिस दलाने तीव्र मोहीम राबवावी. यात विक्री प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांची यादी तयार करण्यात आली असून, यातील सातजणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात मायक्रो फायनान्स करणार्या कंपन्यांविरोधात अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. यातील 16 कंपन्यांच्या अधिकार्यांना बैठकीला बोलावण्यात आले होते. 20 ते 30 हजार रुपये थकलेल्यांना वसुलीसाठी रात्री अपरात्री प्रत्यक्ष जावून किंवा फोन करुन त्रास दिला जात आहे. यापुढे सकाळी 9 ते साय. 6 वाजेपर्यंतच वसुली करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. या मायक्रोफायनान्सबाबत 3 एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना दिल्या असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.