रत्नागिरी:- ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येणार्या कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकास होण्याकरिता शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत तीर्थक्षेत्रांना सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर या प्रमुख तिर्थस्थळांचा समावेश आहे.
अयोध्यास्थित प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण अशा ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी देण्यात आली. या योजनेतंर्गत कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटी ऐवजी पाच कोटींचा विकासनिधी उपलब्ध करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरुंना विविध सोयीसुविधा पुरविणे, आवश्यक आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरविणे शक्य होत नाही. म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तीर्थक्षेत्रांना नविन प्रस्तावित निकषाप्रमाणे 3 कोटी इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे. प्रादेशिक योजनेत आणखी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या निधीमधून विविध सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये तीर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, स्नानगृह, भाविकांसाठी भक्तनिवास, परिसर सुशोभीकरण, वृक्षारोपण, वाहनतळ यासंह पर्यटकांची सुरक्षितता अशा विविध सुविधा या ठिकाणी करता येणार आहेत.