रंगपंचमीच्या सायंकाळी भोके-मायंगडेवाडीत शिरला बिबट्या

अख्खा गावाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पळवून लावण्यात यश

रत्नागिरी:- रंगपंचमीच्या सायंकाळी भोके-मायंगडेवाडीतील भर वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे एकच हलकल्लोळ उडाला. प्रेम मायंगडे यांच्या लाकडाच्या खोपीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी अख्खा गाव धावू लागला. लोकांचा गोंधळ ऐकल्यानंतर बिबट्या काहीसा बिथरला होता; मात्र एक तासाच्या प्रयत्नानंतर त्या बिबट्याला जंगलाकडे पळवून लावण्यात ग्रामस्थांना यश आले. या गोंधळात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हा थरार मंगळवारी (ता. 22) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला.

्मंगळवारी सायंकाळी भोके मायंगडेवाडीतील ग्रामस्थ रंगपंचमीचा आनंद घेऊन घरी परतलेले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारा बिबट्याच्या डरकाळ्याचा आवाज काहींच्या कानावर पुसटसा आला होता; मात्र ग्रामस्थांनी ते मनावर घेतले नाही. वस्तीच्या मध्यभागी लाकडे ठेवण्याच्या छोटीशा खोपीत (खोली) भलामोठा बिबट्या लपून बसला होता. डरकाळ्यांच्या आवाजामुळे ग्रामस्थांकडून शोध सुरु झाला. बॅटरीच्या उजेडात बिबट्याचे डोळे चमकलेले दिसले. प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होते, अरे छोटा नाही, मोठा बिबट्या आहे. त्याला मारायचं नाही, पळवून लावूयात असे एकमेकाला सांगत मायंगडेवाडीवासीय लाठ्या, काठ्या हातात घेऊन पुढे सरसावले. वस्तीत बिबट्या घुसल्याची माहिती अवघ्या गाव गोळा झाला होता. आरडोओरडा, ग्रामस्थांचा गोंधळ आणि बॅटर्‍यांचा उजेड यामुळे बिबट्या थोडा बिथरला. त्याने अचानक काळोखाच्या दिशेने झुडपात सुर मारला. अडचणीची जागा असल्यामुळे कुणालाच काही समजत नव्हते. सगळ्याच्या अंगावर भितीचा काटा आला. काळोखामुळे कुणीकडूनही बिबट्या हल्ला करु शकतो अशी भिती होतीच. बॅटर्‍यांच्या उजेडात पुन्हा शोधाशोध सुरु झाली. तेवढ्यात एका ग्रामस्थाला बिबट्याचे डोळे चमकताना दिसले. बिबट्याला पळवून लावण्यासाठी गावकर्‍यांनी प्रयत्न सुरु केले. हाकार्‍या देत, लाठ्या-काठ्यांचा आवाज करत ग्रामस्थ बिबट्याला पळवून लावण्यासाठी उचकवत होते. सुमारे एक तास हा थरार चालू होता. अखेर तो बिबट्या एका ग्रामस्थाच्या अंगणाच्या दिशेने उड्या मारत पळून गेला. त्याच्या पाठून अवघा गाव धावला. बिबट्या पुढे आणि काठ्या घेतलेेले ग्रामस्थ मागे अशी रेस लागली. काही क्षणात जवळ असलेल्या जंगल भागामध्ये तो पळून गेला. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला कळवलेले नव्हते. दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या वस्तीत घुसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.