मोबाईलवर आला धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज; अनेकजण संभ्रमात

रत्नागिरी:- गुरुवारी सकाळी १०.२० वाजता अनेकांच्या मोबाईलवर एक धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज आला. त्यानंतर १०.३२ वाजता पुन्हा एकदा मेजेस आला. एकाचवेळी सर्वांच्या मोबाईलवर एकच मेसेज आल्याने प्रचंड घबराहट उडली. हा कोणता स्कॅम तर नाही ना? आपला मोबाईल हॅक तर झाला नाही ना? मेजेसवर क्लिक केलं तर मोबाईलचा स्फोट तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले.

देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. हा मेसेज म्हणजे, सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली.

यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.
सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३२ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. यामुळे प्रचंड संशयकल्लोळ निर्माण झाला होता. विशेषत: ग्रामीण भागात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. अजूनही नागरिकांमध्ये त्या मेसेजबद्दल भीतीचे वातरावरण आहे. मात्र आज तुम्हाला आलेला अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे काळजीचं कोणतंही कारण नाही.