मिशन बंधारे अंतर्गत जिल्ह्यात उभारणार 8460 बंधारे

रत्नागिरी:- पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त उपाययोजना राबविण्यास जि. प. प्रशासनाने सुरुवात केली आहे. दरवर्षी दिवाळीनंतर गतीमान केली जाणारी ‘मिशन बंधारे’ मोहिम लवकर सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात 8460 बंधारे बांधण्यात येणार आहे

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यांपासून पाणी टंचाईस सामोरे जावे लागते. त्यामुळे पाणी अडवून व जिरवून बोअरवेल, विहिरीची पाण्याची पातळी वाढविण्याकरिता तसेच पाण्याचा शेती व गुरांना पिण्याकरिता उपयोग होत असतो. नदी, नाले, ओहोळ, प-यावर छोटे-मोठे कच्चे, वनराई, व विजय बंधारे बांधल्यास मोठया प्रमाणात फायदा होऊन पाणी टंचाईच्या काळात दुर्भिक्ष टाळता येते. त्यासाठी प्रत्येक ग्रा.पं.ने किमान 10 वनराई/कच्चे/विजय बंधारे नदी, नाले, ओहोळ येथे बांधून पाणी अडवणे व जिरवणे गरजेचे असल्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यावर्षीचा पावसाळी हंगाम पाहता जिल्ह्यात पर्जन्यमान देखील सर्वसाधारण राहिलेले आहे. या हंगामात मोठ्या प्रमाणात पावसाने खंड दिला होता. त्याचा परिणाम अनेक भागात कमी अधिक पर्जन्यमान राहिलेले आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 98 टक्के इतके पर्जन्यमान झाले आहे. तर एकूण 3 हजार 141.4 मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. इतके पर्जन्यमान झालेले असले तरी वाढते तापमान आणि झपाट्याने खालावणार्‍या पाण्याच्या पातळीमुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. आता तर पाऊस महाराष्ट्रातून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणेने पाणी टंचाई निवारणासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

दरवर्षी जिल्हा परिषद स्तरावरून हाती घेतली जाणारी ‘मिशन बंधारे मोहिमेला दिवाळीनंतरच प्रारंभ होतो. प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान 10 कच्चे, वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात येते. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील गावागावात पाणी योजनांचे कामे हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लोकसहभागातून बंधारे उभारण्याकडील लोकांचा कल कमी होत असल्याची बाब गतवर्षी समोर आली होती. पण यावर्षीच्या हंगामात ही ‘मिशन बंधारे’ मोहीम दिवाळीनंतर नव्हे तर दसर्‍यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10 बंधारे बांधावेत, अशा सूचना केल्या आहेत.