रत्नागिरी:-समुद्राच्या उधाणामुळे दरवर्षी पावसाळ्यात होणारे मिर्या गावाचे संरक्षण करण्यासाठी १६९ कोटी रुपये मंजूर आहेत. या बंधार्याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २६ डिसेंबरला दुपारी ३ वाजता होणार आहे. तेथील किनार्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी २५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
अल्पबचत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अॅड. अनिल परब, गृहराज्यमंत्री सतेज पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. पावसाळ्यात उधाणाच्या लाटांमुळे मिर्या गावाला सातत्याने धोका निर्माण होत आहे. कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सुरक्षित बंधारा उभारला जाणार आहे. या बरोबरच अनेक विकास कामेही मंजूर झाली असून काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. रत्नागिरीत प्रथमच चालू होत असलेल्या शासकीय इंजिनिअरींग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला ८२ टक्के प्रवेश झाले आहेत. या कॉलेजच्या इमारतीसाठी ४५ कोटी रुपये मंजूर असून पायाभूत सुविधांसाठी २ कोटी ६० लाख रुपये मिळणार आहेत. सेंट्रल ऑफ एक्सलंससाठी ३० कोटी मंजूर आहेत. शहरातील थिबापॅलेस येथील जिजाबाई उद्यानात मॉसाहेब जिजाबाई आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी निधी दिला आहे. शहरातील चौकांचे सुशोभिकरणाचे काम मारुती मंदिर येथून सुरु झाले असून त्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर आहेत. जे.जे. स्कूल ऑफ आर्टसला दोन कोटी वर्ग केले आहेत. नळपाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. तारांगणासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अमेरीकेतून आयात केल्या असून ३० जानेवारीपर्यत रत्नागिरीत दाखल होतील.
रत्नागिरी शहरातील १०५ रस्त्यांच्या कामासाठी ३४ कोटी आले असून त्यातील ३४ कामे पूर्ण झाली आहेत. अंतर्गत रस्त्यांसाठी आणखी पाच कोटी अतिरिक्त निधी मिळणार आहे. शहरातील घनकचरा प्रकल्पासाठी तीन एकर जागा एमआयडीसीकडे निश्चित झाली आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प होणार आहे. टिळक स्मारकासाठी रचना आर्कीटेक्ट कॉलेजची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात शंभर मुलींच्या क्षमतेचे वसतीगृह उभारले जाणार असून त्यासाठी ११ कोटी रुपये निधी आला आहे.