रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्याबंदर, ढाकरी येथे शुभांगी सावंत यांच्या मालकीच्या आंबा बागेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १० हजार रुपये किंमतीच्या २५० किलो आंब्यांची चोरी केली. ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ ते २५ एप्रिल रोजी सकाळी ८.३० या दरम्यान घडली. याबाबतची तक्रार २६ एप्रिल रोजी रात्री रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी सूर्यकांत गजानन सावंत (वय ६१, व्यवसाय आंबा व्यवसाय, रा. सडामिऱ्या) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शुभांगी सावंत यांची मिऱ्याबंदर येथील आंबा बाग कराराने घेतली आहे. अज्ञात चोरट्यांनी बागेचे काटेरी कुंपण तोडून आत प्रवेश केला आणि झाडांवरील सुमारे २५० किलो वजनाचे आंबे चोरून नेले. चोरी झालेल्या आंब्यांची किंमत अंदाजे १० हजार रुपये असून, ते रिप्स रोगामुळे पांढरे डाग असलेले होते आणि त्यांचा प्रति किलोचा दर ४० रुपये होता.
रत्नागिरी शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञाताचा शोध घेत आहेत.