मिरकरवाडा हाणामारी प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरकरवाडा येथे प्लॅस्टिक पिशवीचे ५ रुपये स्कॅन करण्याच्या वादातून दोन गटांत मारहाणी प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना मंगळवार १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास घडली होती.

मकसूद सोलकर, सोहेल साखरकर, यासिन साखरकर, ताबीज साखरकर, ऊफ साखरकर, उबेद होडेकर आण अन्य दोन जण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहेत.

त्यांच्या विरोधात अर्जुन उमेश चव्हाण (१८, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी अर्जुन चव्हाण हा मिरकरवाडा येथील जेटीवर मच्छि खेरदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी मच्छि खखरेदी केल्यानंतर त्याने बाजुलाच प्लॅस्टिक पिशवी विकणाऱ्या टेम्पोतील विक्रेत्याकडून एक पिशवी विकत घेतली. त्या पिशवीचे पैसे देण्यासाठी अर्जुन त्या विक्रेत्याकडील स्कॅनरचा वापर करत असताना विक्रेत्याने तो स्कॅनर बंद असल्याचे अर्जुनला सांगितले. तेव्हा अर्जुनने आपल्याकडे रोख रक्कम नसल्याचे सांगितल्यावर पिशवी विक्रेत्यामध्ये आणि अर्जुनमध्ये बाचाबाची झाली होउन त्यांच्यात धक्काबुक्की झाली. या प्रकारानंतर अर्जुनने त्याचे भाउ विलास चव्हाण, किरण चव्हाण आणि करण चव्हाण (सर्व रा. मुरुगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी) यांना घटनास्थळी बोलावून घेतल्यानंतर दोन्ही गटांत मारहाण झाली होती.