मित्राचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या मित्राला जन्मठेप 

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील आंबव कातवळवाडी येथे काजु बीच्या पैशांच्या वाटणीच्या व्यवहारातून मित्रावर कोयतीने वार करुन खून करणार्‍या आरोपीला न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना 5 जून 2020 रोजी घडली होती. यात संदिप विठ्ठल केदारी (43,रा.ओझरे खुर्द,गवळीवाडी संगमेश्वर) या तरुणाचा खून करण्यात आला होता.

संतोष शंकर धाटे (44, रा.आंबव कोंडकदमराव कातळवाडी संगमेश्वर,जि.रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत प्रकाश तुकाराम पांचाळ (54, रा. आंबव सुतारवाडी संगमेश्वर,रत्नागिरी) यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानूसार,या दोघांमध्ये काजु बीच्या पैशांच्या वाटणीतून संतोषच्या अंगणात वाद झाला होता.या रागातून संतोषने संदिपवर लोखंडी कोयतीने वार करुन त्याचा खून केला होता.याप्रकणी देवरुख पोलिस ठाण्यात संतोषवर भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणाचा तपास तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.गुरुवारी या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने संतोषला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.वर्षा प्रभू यांनी काम पाहून 13 साक्षिदार तपासले.तसेच असून पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक सागर उगळे यांनी काम पाहिले.