सुदैवाने जीवितहानी टळली
रत्नागिरी:- शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर चौक परिसरात आज संध्याकाळी सातच्या सुमारास एसटी बस आणि कारचा अपघात झाल्याची घटना घडली. रत्नागिरी आगारातून बोरिवलीच्या दिशेने जाण्यासाठी निघालेली एसटी बस(क्र. MH 14 LX 6922) मारुती मंदिर येथे आली असता, त्याच दिशेने जाणाऱ्या एका कारने(क्र.MH 08 AG 1134) एसटीच्या मागच्या टायरच्या बाजूला जोरदार धडक दिली.
या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघात घडताच मारुती मंदिर परिसरात काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, परंतु कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतूक पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत या भागात कोणतीही मोठी वाहतूक कोंडी होऊ दिली नाही. अपघातग्रस्त दोन्ही गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे सध्या पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.









