मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हा दाखल

रत्नागिरी:-किरकोळ कारणातून एकमेकास शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शुक्रवार 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 ते 1 वा.कालावधीत कुवारबाव परिसरात घडली होती. याबाबत शनिवारी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

दिलिप वाडकर,चेतन भिंगारे,दिलिप भिंगारे व इतर दोघे अशा पाच जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दिलीप आण्णा भिंगारे (55,रा.उत्कर्षनगर,रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार,शुक्रवारी दुपारी ते मुलासोबत गाडीतून घरी जात होते.त्यावेळी समोरुन हातखंबाकडून येणारा ट्रक चालक गुरुप्रसाद चव्हाण जोरात ट्रक घेउन आला तेव्हा भिंगारे यांचा मुलगा चेतन अरे माणसे बघ,गाडी हळू चालव असे ट्रक चव्हाणला बोलला.यातून दोघांमध्ये वाद सुरु झाल्याने दिलिप भिंगारे यांनी मुलाला गाडी घरी घेउन जाण्यास सांगितले, व ते शिवसेना शाखा कुवारबाव येथे थोडा वेळ थांबून घरी जात होते. तेव्हा त्यांच्या पाठीमागून आलेल्या बोलेरो गाडीने त्यांना धडक देत बाजुच्या गटारात पाडून गाडीतील तिघांनी त्यांना शिवीगाळ करत हातांनी तसेच लोखंडी पाईपने मारहाण केली.

तसेच याबाबत गुरुप्रसाद विजय चव्हाण (28,सध्या रा.पाली,रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,शुक्रवारी दुपारी ते आपल्या ताब्याती ट्रकचे टायर बदलण्यासाठी जात असताना जे.के.फाईल्स येथे जात होते.ते कुवाबाव येथे आले असता स्पीड ब्रेकरवर ट्रकचा वेग कमी केला असता समोरुन येणार्‍या कारमधील चेतन भिंगारेने त्यांच्या ट्रकसमोर कार आडवी लावून चेतन व त्याच्या वडिलांनी गुरुप्रसादला ट्रकमध्ये चढून ट्रक अंगावर घालतोस काय असे म्हणत हातांनी मारहाण केली.याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.