भरधाव कारची तीन पादचारी महिलांना धडक; दोन महिला गंभीर जखमी

लांजा:- भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पादचारी महिलांना पाठीमागून धडक देत उडवल्याने दोन महिला गंभीर तर एक महिला किरकोळ जखमी झाली. हा अपघात शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास वाटुळ दाभोळे मार्गावर विलवडे ग्रामपंचायत, होळीचा मांड येथे घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम सोमा राडये (वय ५३, रा.विलवडे वाकिवाडी, ता.लांजा) यांनी लांजा पोलिसांत फिर्याद दिली आहे. शांताराम राडये यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जयश्री जयवंत कोंडसकर, योगीता चंद्रकांत चौगुले आणि वासंती चंद्रकांत मालपेकर (तिन्ही रा.वाकेड गावकरवाडी, ता.लांजा, जि.रत्नागिरी) या तिघी आणि फिर्यादी शांताराम राडये हे मजुरीचे काम करतात. नेहमीप्रमाणे ते काम आटोपून शिरवली फाटा येथे चालत जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डिझायर कारने (एमएच.०१.ईजे ८५३५) जोरदार ठोकर देऊन तिघींना उडवले. ज्ञी कार चालक नितीन चंद्रकांत परब (वय ४७, रा.बी/५०२, द नेस्टे बिल्डिंग, एम.एन.मार्ग मुंबई, माहीम) हा चालवत होता.

या अपघातात जयश्री कोंडसकर ही किरकोळ जखमी असल्याने तिच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर योगीता चौगुले आणि वासंती मालपेकर या दोघी गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, भरधाव वेगाने कार चालवत तिन महिलांच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीसांनी कार चालक नितीन परब याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), (ब), मोटारवाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.