रत्नागिरी:- वाटद-खंडाळा येथे प्रेमसंबंधातून भक्ती मयेकर (२६,रा.मिरजोळे नाखरेकरवाडी,रत्नागिरी) या तरूणीचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. तसेच सिताराम किर याचा ज्या ठिकाणी जबर मारहाणीत मृत्यू झाला होता. हे दोन्ही खून सायली देशी बार येथे करण्यात आले होते. हे ठिकाण गुरूवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आले. या दरम्यान भक्ती मयेकरचा मोबाईल या बारमधून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
भक्ती मयेकरचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या गुन्हयातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. मोबाईधील तिचे दुर्वाससोबत झालेले कॉल डिटेल्स, चॅटिंग तसेच सिताराम वीर तिच्याशी फोनवर अश्लिलपणे बोलत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शहर पोलिस आता भक्ती मयेकरच्या मोबाईलचे सीडीआर तपासणार आहेत. या तांत्रिक तपासातून या गुन्ह्यातील अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. या तपासादरम्यान संशयितांविरोधात एक सबळ पुरावा मिळण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सायली देशी बारचा मालक असलेला दुर्वास पाटील याचे भक्ती मयेकर हिच्याशी प्रेमसंबंध होते. भक्ती मयेकर त्याला सतत लग्नासाठी तगादा लावत असल्याने त्याने विश्वास पवार व सुंशात नरळकर या दोघांच्या मदतीने तिचा १६ ऑगस्ट रोजी आपल्या बारमध्ये वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह आंबा घाटात फेकून दिला होता. याआधी त्याने भक्तीला फोनवरून अश्लिल भाषेत बोलत असल्याच्या कारणातून सिताराम लक्ष्मण किर (वय ५५, रा. कळझोंडी) याला विश्वास पवारच्या मदतीने मारहाण केली होती. यातच सिताराम किर याचा मृत्यू झाला होता. ही घटना २९ एप्रिल २०२४ रोजी घडली होती. राकेश जंगम हा सितारामच्या खुनाची माहिती पोलिसांना देईल, या भीतीने त्याने त्याचाही खून केला होता.