जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाब; खा. सुनील तटकरेंना देखील सुनावले
रत्नागिरी:- ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आपल्या कडक स्वभावामुळे आणि आक्रमक शैलीमुळे सर्वपरिचीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामध्ये, नार्वेकर काय कोण लागून गेला आहे का? असे त्यांनी म्हटल्यावरुन वाद निर्माण झाला होता. तर, विधिमंडळ अधिवेशनातही त्यांचा आक्रमकपणा सभागृहात दिसून आला. आता, रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे दिशा समिती आणि रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या ऑनलाईन बैठकीची लिंक वेळत न मिळाल्याने भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला, तर सुनिल तटकरेंनाही सुनावलं.
रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे दिशा समिती आणि रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीची लिंकच वेळेत न मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव तब्बल दोन तास ताटकळत राहिले. दुपारी 12 वाजता होणाऱ्या बैठकीची लिंक चक्क पावणेदोन वाजेपर्यंतही न मिळाल्याने दिशा समितीची बैठक संपून गेली. अखेर रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सहभागी होताच आमदार जाधव यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? आम्हाला बैठक आहे हे कळवण्याचा साधा शिष्टाचारही नाही का? ही नेमकी कोणती कार्यपद्धती? असा खरमरीत सवाल भास्कर जाधव यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना केला. त्यानंतर, बैठकीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासमोरही त्यांनी या गंभीर हलगर्जीपणाचा जाब विचारला. एका लोकप्रतिनिधीला वेळेत बैठकीची लिंकही न पाठवता प्रशासनाने निष्काळजीपणाचा कळस गाठल्याची टीका त्यांच्याकडून करण्यात आली.









