रत्नागिरी:- जिल्ह्याच्या समुद्रात गेल्या महिनाभरापासून निर्यात होणारी आणि चांगल्या चवीची पापलेट, सुरमई सोनेरी मासळी जाळ्यात सापडणे कमी झाले आहे. या माशाचे दरही वधारलेले असून जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.
जिल्ह्याला 167 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मच्छीमारी उद्योगाला उपयुक्त अशी छोटी-मोठी 46 मासळी उतरण्याची केंद्र किंवा बंदरे आहेत. जिल्ह्यात 3 हजार 961 मासेमारी नौका असून त्यात 3 हजार 519 यांत्रिकी नौका तर 442 बिगर यांत्रिकी नौका मासेमारी करतात; परंतू गेल्या महिन्याभरात या मच्छीमार नौकांना मासेमारी नौकेसाठी येणार्या खर्चाइतकी मासळी मिळत नाही. यंदा हंगाम सुरु झाल्यानंतर बांगडा, कोळंबी बर्यापैकी मच्छीमारांच्या जाळ्यात सापडू लागली. ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी मासळी मिळण्याचे प्रमाण चांगले होते. गेल्या चार दिवसात दिवसा ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे, तर थंडीचा जोर कमी होत आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम मासळीवर झाला असून मासा खोल समुद्राकडे किंवा पुढे सरकु लागला आहे. यंदा देशात सगळीकडेचे किनारपट्टीवर बांगडा मोठ्याप्रमाणात सापडत आहेत. त्याला रत्नागिरी जिल्हाही अपवाद राहिलेला नाही. निर्यातीला पुरेसा मासा मिळाला असून उर्वरित मासा स्थानिक बाजारातच विकला जात आहे. 100 ते 120 रुपये किलोने विकला जाणारा बांगडा सध्या 30 ते 40 रुपयांनी विकला जात आहे. जिल्ह्याच्या किनारी भागात दर नसलेली उष्टी बांगडी मिळत आहे. ही मासळी फिशमील कंपन्यांंसाठी उपयुक्त आहे. परंतू या मासळीलाही दरवर्षीप्रमाणे दर मिळत नाही. दक्षिणेकडील राज्यातून अशी मासळी जिल्ह्यातील फिशमील कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात आल्याने दर घसरला आहे. निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेला बांगडा काही प्रमाणात मिळत असला तरी त्यालाही दर नाही.
या परिस्थितीत पापलेट, सुरमई सारखी दर देणारी मासळी कमी होत आहे. सध्या हा मासा वसई किनारपट्टीकडील भागात मिळत आहे. पालघर, ठाणे, रायगड या उत्तर कोकण परिसरात पापलेट मासा सर्वाधिक मिळतो; परंतु तिकडेही तो कमी झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही प्रमाणात मासा मिळत होता. पण सध्या तोही दुर्मिळ झाला आहे. सध्या अनियंत्रित मासेमारी सुरु असून छोटा मासा मोठ्याप्रमाणात मारला जात आहे. हा मासा खडकाळ परिसरात मिळत असून पावसाच्या कालावधीत सर्वाधिक असतो. सध्या 1200 रुपये किलोने पापलेट विकला जात आहे. सुरमईचा दर 600 ते 700 रुपये किलो आहे.
दरम्यान, तेलवाहू जहाज बुडाल्यानंतर पाण्यावरील तेलाचे तवंग कोकण किनारपट्टीवर पसरलेले आहेत. त्याचा मत्स्य उत्पादनावर परिणाम होत आहे का याचा अभ्यास करण्याची मागणी मच्छीमारांकडून होत आहे.