रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील एसटी स्टँड येथून भरदिवसा तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. विशाल रजपूत असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव होते. भर दिवसा मारहाण करत सुमो गाडीत कोंबून अपहरण करण्यात आले होते. अपहरण करणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी दीड तासात मुसक्या आवळल्या आहेत.
अपहरणाची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता घडली हाेती. विशाल रजपूत (21, रा.सारखरी नाटे पोलिस ठाणे शेजारी ता.राजापूर) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ मनोज मंगेश शिर्के (21, मुळ रा. नालासोपारा सध्या रा. नाटे राजापूर) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, मनोज शिर्के हे त्यांचा मामे भाऊ विशाल रजपूत याच्याकडे आले होते. शुक्रवारी सकाळी हे दोघेही पावस एसटी स्टॅड येथे आले होते. त्यावेळी टाटा सुमो गाडीतून पाच जण तिथे आले आणि त्यांनी विशालला मारायला सुरुवात केली आणि दमदाटी करुन त्यांनी विशालला सुमो गाडीत घातले आणि गाडी रत्नागिरीच्या दिशेने निघून गेली. मनोज यांनी पोलिसांना तत्काळ संपर्क केला. त्यानंतर पूर्णगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश गावीत यांनी तत्काळ आपल्या तपासाची चक्रे फिरवली.तांत्रीक मदत घेऊन गाडी कुठे गेलीय याची माहिती पोलिसांना मिळाली. या गाडीला रत्नागिरी शहारानजीकच्या शिरगाव येथील तिवंडे वाडी येथे पकडण्यात आले असे श्री. गावित यांनी सांगितले. हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाला असावा असा अंदाज आहे.
या प्रकरणी शाकिर सुहेल बोरकर (34, रा. कीर्ती नगर), राजू रुपालसिंग राठोड (38, कोकण नगर), संतोष गोविंद ठीक (47, शिरगाव तिवंडेवाडी), अब्दुल गणी शेख (46, मजगाव), विजय बाबल्या तारवे (65, रा. शिरगाव तिवंडे वाडी) यांना ताब्यात घेण्यात आले . या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश गावीत करत आहेत.