पाली येथे किरकोळ वादातून तरुणाला मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली येथील माईनवाडीकडे जाणाऱ्या तिठ्याजवळ जुन्या वादातून एका तरुणाला काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी, ५ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजय संतोष खान (वय ३४, रा. पाली माईनवाडी) हे पाली बाजारपेठेतून आपल्या घरी माईनवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जात होते. माईनवाडीकडे जाणाऱ्या तिठ्याजवळ पोहोचले असता, रामचंद्र नायडू गराटे (रा. पाली गराटेवाडी) या आरोपीने त्यांना गाठले. जुन्या वादाच्या कारणावरून रामचंद्र गराटेने सुजय खान यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना काठीने मारहाण करण्यात आली, ज्यामुळे सुजय जखमी झाले.

या घटनेनंतर सुजय यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रामचंद्र नायडू गराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.