निवळी घाटातील अपघात प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- गोवा ते मुंबई महामार्गावरिल निवळी घाट उतारात कंटेनरचा अपघात झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिपीनकुमार जगदीश सिंग (वय ३२, रा. गुलावपूर, ता. सिंकदाराव जि. हातरस, राज्य उत्तरप्रदेश ) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निवळी घाट उतारात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित बिपीनकुमार हे कंटेनर (क्र. एनएल-१ एसी २४६१) हा घेऊन गोवा मुंबई मार्गावरुन जात असताना निवळी घाटात कंटनेर निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या बाजूला दोन दुचाकी व त्यापुढे प्रताप प्रकाश खापरे यांच्या वडापाव च्या टपरीस ठोकर दिली. तसेच पुढे फिर्यादी विजय धोंडू आडविलकर (रा. निवळी बावनदी, रत्नागिरी) यांच्या दुकानासमोरील इलेक्ट्रीक पोल ला ठोकरुन कंटेनर त्याच्या दुकानात शिरला. या अपघातात दुकानाचे पत्रे, भिंती व दुकानातील किराणा मालाचे नुकसान झाले. फिर्यादी याची पत्नी सौ. वैशाली आडविलकर (६५), हिच्या तोडाला व डोक्यास मार लागून दुखापत झाली. या प्रकरणी विजय आडविलकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.