निलिमा चव्हाणच्या व्हिसेराचा अहवाल पोलिसांना प्राप्त; मृत्यूचं खरं कारण आले समोर

चिपळूण:- ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पोलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा होती. हा अहवाल शुक्रवारी (११ ऑगस्ट) पोलिसांना प्राप्त झाला. या अहवालानुसार तिच्या शरीरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दापोली येथील एका बँकेत कामाला असणारी नीलिमा ओमळी येथील गावी जाण्यासाठी २९ जुलै रोजी निघाली होती. मात्र, तिचा १ ऑगस्ट रोजी दाभोळ खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राथमिक तपासानुसार तिचा घातपात नसल्याचे स्पष्ट केले होते. तपासात त्यांनी १०४ साक्षीदारही तपासल्याचे सांगितले होते. त्याचवेळी व्हिसेरा अहवालानुसार सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे पोलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा होती. हा अहवाल तातडीने मिळावा, अशी विनंतीही पोलिसांनी केली होती.

हा अहवाल शुक्रवारी पोलिसांना प्राप्त झाला असून, तिच्या शरीरात कोठेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानुसार तिच्या शरीरावर कोठेही जखमा नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.