रत्नागिरी:- दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून 76 जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाउंट , बँक ओटीपी, एटीएम पीन आदीच्या मागणी करुन फसवणूक केली आहे. पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला आहे. त्यांच्या माध्यमातून जनजागृती आणि फसवणुकीच्या प्रकारांना प्रतिबंध करण्यात यश आले आहे. दोन वर्षात 76 पैकी केवळ सहा गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश आले आहे. गुन्हे उघड करण्यात चिपळूण उपविभाग आघाडीवर आहे. रत्नागिरी,खेडने दोन वर्षात एकही सायबर गुन्हा उघड केला नाही. तर लांजा विभागातील पोलीस स्थानकांमध्ये एक गुन्हा उघड झाला आहे.
कोरोना महामारीच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या काळात जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहारावर भर देण्यात आला. त्याचा फायदा काही सायबर गुन्हेगार उठवित आहेत. नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांची फसवणूक सुरू आहे. पोलिस, बँकांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे जनजागृती सुरू आहे. तरी नागरिक आमिषाला बळी पडून फसवणूक करून घेत आहेत.
तुमचा मोबाईल नंबर विनर ठरला आहे. तुम्हाला लाखोचे बक्षिस लागले आहे. तुमचा बँक खाते क्रंमाक आणि युपीआय कोड द्या, तुमच्या खात्यात बक्षिसाची रक्कम जमा होईल. मी बँक मॅनेंजर बोलतोय. तुमच्या एटीएमची मुदत संपली आहे. तुम्हाला दुसरे एटीएम लवकच मिळेल, त्यासाठी एटीएम नंबर आणि त्याचा पिन द्या, असे अनेक बहाणे करून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करीत आहेत. पिन नंबर मिळाला की, काही क्षणात त्याच्या खात्यातून रक्कम जाते. आपल्या खात्यातून हजारो रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला की ते जागे होतात. तसेच प्रतिष्ठित लोकांची बनावट फेसबुक अकाऊंट काढुन त्याद्वारे पैसे मागण्याचे प्रकार अधिक घडत आहेत.
सध्या सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडून अनेकांना गंडा घालणे आणि संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याचे प्रकार वाढत आहेत. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात सायबर बाबत 76 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सन 2020 मध्ये चिपणूळमध्ये 15, रत्नागिरी उपविभागात 4, लांजा उपविभागात 6, खेड उपविभागात 13 अशा 38 तक्रारी दाखल झाल्या.