तिहेरी हत्या प्रकरण; जयगड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराचे निलंबन

रत्नागिरी:- जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक  कर्मचारी अडचणीत आला आहे. बेपत्ता व्यक्तींच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चौकशी अंती पोलीस हवालदार प्रसाद सोनावणे याला निलंबित करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढू लीगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी देखील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसारच, पहिली कारवाई म्हणून साहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

चौकशीदरम्यान राकेशची हत्या केल्याची कबुली

दरम्यान, 6 जून 2024 ला राकेश जंगम याचा खून करून त्याचा मृतदेह आंबा घाट येथे फेकून देण्यात आला होता. या खुनाच्या प्रकरणात मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने चौकशीदरम्यान राकेशची हत्या केल्याची कबुली दिली. दुर्वास पाटील याच्यासोबत या गुन्ह्यात विश्वास पवार आणि नीलेश भिंगार्डे यांचाही सहभाग असल्याचे समोर आलं आहे. मृत राकेश जंगम हा दुर्वास पाटील यांच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. तर 21 जून 2024 रोजी राकेशची आई जयगड पोलीस ठाण्यात राकेश बेपत्ता असल्याचा तक्रार अर्ज दिला होता. पण त्याचा शोध लागला नाही. पोलिसांच्या या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेऊन चौकशी अंती सोनावणे या हवालदाराला निलंबित केलं आहे.