तरुणाला दहा जणांनी घेरत केले तलवारीने सपासप वार; साखरपा येथे प्रचंड तणाव

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे कबड्डी स्पर्धेतून झालेल्या तत्कालीन वादाच्या रागातून साखरपा गावातील सागर वैद्य या (22 वर्षे) तरुणावर सुमारे 10 जणांनी तलवारीने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागर वैद्य याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या हल्ल्यानंतर साखरपा येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी साखरपा दुरुक्षेत्राला घेराव घालत जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या घटनेमुळे साखरपा गावात तणाव निर्माण झाला असून रात्री उशिरा पोलिसांची अतिरिक्त कुमक रत्नागिरीतून साखरपा गावाकडे रवाना झाली होती. तर उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे हे रात्री घटनास्थळी दाखल झाले होते.

गेले तीन दिवस साखरपा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीचा सामना सुरू होता.त्या ठिकाणी एक तरुण उभा होता. त्या पाठीमागे प्रेक्षक असल्याने त्याला बाजूला होण्याची सूचना तेथील काहींनी केली होती. यातूनच वादाला सुरुवात झाली. परंतु त्यानंतर हा वाद चर्चेद्वारे मिटवण्यात आला होता. परंतु संबंधित व्यक्तींच्या डोक्यात राग खदखदत होता.

ज्या तरुणाबद्दल राग होता, ज्याच्यावर हल्ला करायचा होता, तो तरुण जी गाडी चालवत होता तीच गाडी घेऊन सागर गेला होता. परंतु ती व्यक्ती वादातील असल्याचा समज करून घेऊन 10 जणांनी तलवारीने सागर वैद्य याच्यावर सपासप वार केले. यामध्ये सागर जखमी अवस्थेत साखरपा येथे कोसळला. त्याला तात्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर साखरपा गावात तणाव निर्माण झाला असून मोठा जमाव साखरपा दुरक्षेत्रवर धडकले होते. तर रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार तेथील एका हॉटेलवर हल्ला झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले, परंतु याला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला नव्हता.परंतु रात्री उशिरा पोलिसांची अतिरिक्त कुमक रत्नागिरीतून साखर त्याच्या दिशेने रवाना झाली होती.

राग एकावर हल्ला दुसऱ्यावर
कबड्डी स्पर्धेदरम्यान ज्या तरुणासोबत वाद झाला होता. तोच तरुण सागर वैद्य असल्याचा समज झाल्यामुळेच दहा जणांच्या टोळक्याने सागर वर वार केल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.