जिल्ह्यात 476 केंद्रांवर एका क्लिकवर दाखले

रत्नागिरी:- विविध दाखले, प्रमाणपत्रे गावपातळीवर मिळावीत यासाठी शासनाने ‘आपले सरकार‘ योजना कार्यान्वित केली आहे. त्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावीत केलेल्या 524 केंंद्रांपैकी 476 ठिकाणी या सेवा केंद्रांचे काम सुरळीत आहे. त्यामुळे एका क्लिकवर दाखले गावपातळीवर मिळू शकतात.

जन्म-मृत्यू दाखल्यांसह रहिवास प्रमाणपत्रे, भुमिहीन दाखला, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र, ज्येष्ठ प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी यासह रेल्वे तिकिट नोंदणीसाठी ग्रामीण भागातील लोकांना शहरात यावे लागत होते. त्यामध्ये खर्च आणि वेळ दोन्ही वाया जात होते. या सर्व सुविधा गावातच मिळवून देण्यासाठी शासनाने 2017 साली शहरातील सेतू सुविधांच्या धर्तीवर आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारी यंत्रणा आणि कंत्राटी कर्मचारीही शासनाने पुरवले. सुरवातीला ग्रामीण भागात नेट सुविधेच्या अभावामुळे गोंधळ निर्माण झाला होता; तिन वर्षात ही सुविधा लोकांसाठी उपयुक्त ठरत आहे. गावातच याचा लाभ मिळत असल्याने वेळ आणि खर्चाची बचत होत आहे.

आपले सरकार योजना कार्यान्वित करण्यासाठी काही ग्रामपंचायतींचे क्लस्टर तयार करण्यात आले होते. जिल्ह्यात 846 ग्रामपंचायती आहेत. लोकसंख्येच्या निकषामुळे ग्रामपंचायती क्लस्टर केल्यामुळे 524 केंद्र प्रस्तावित करण्यात आली होती. त्यातील 476 केंद्रांचे काम सुरळीत आहे. उर्वरित 48 केंद्र तांत्रिक अडचणींमुळे बंद आहेत. ती सुरु करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून पावले उचलली जात आहेत. त्यासाठी महानेट योजनेंतर्गत नेट सुविधा ग्रामपंचायत क्षेत्रात दिली जाणार आहे. सध्या केंद्रातील कर्मचारी खासगी डोंगलचा वापर करुन आवश्यक त्या कामांची पूर्तता करत आहेत.