आठ महिन्यांत ११ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
रत्नागिरी:- भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात जानेवारीपासून अवघ्या अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण ८ प्रकरणांत एका खासगी मध्यस्थासह एकूण ११ जणांवर कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सर्वाधिक ५ प्रकरणात ६ जण महसूल विभागाशी संबंधित आहेत. शासकीय कामांसाठी सर्वसामान्य जनतेची अडवणूक करणाऱ्या लाचखोरांना एसीबीने रंगेहात पकडले असून, यामध्ये महसूल विभाग (५ प्रकरणे) ३ मंडळ अधिकारी, २ तलाठी आणि १ कोतवाल, पोलीस प्रशासन (१ प्रकरण) १ पोलीस उपनिरीक्षक आणि १ खासगी इसम
सार्वजनिक पाटबंधारे विभाग (१ प्रकरण) १ कार्यकारी अभियंता आणि १ लिपिक, आरोग्य विभाग (१ प्रकरण) १ वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे.
कोणताही शासकीय अधिकारी वा कर्मचारी कायदेशीर कामासाठी विनाकारण अडवणूक करून लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी त्याला बळी न पडता थेट विरोध करावा. लाच मागणाऱ्याइतकाच लाच देणाराही कायद्याने तितकाच दोषी ठरतो. त्यामुळे नागरिकांनी सजग व सुजाण नागरिकत्वाचे भान ठेवून भ्रष्टाचाराविरुद्ध ठामपणे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाचेची मागणी होताच किंवा लाच स्वीकारताना नागरिकांनी प्रसंगावधान राखून आपल्या मोबाईल अथवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. हा सबळ डिजिटल पुरावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या www.acb.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवरील तसेच मोबाईल ॲपवरील कंप्लेंट पॅनलवर तातडीने अपलोड करावा.
भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून टाकण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासन घडवण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही लाचखोरीच्या प्रकरणात खालील क्रमांकांवर संपर्क साधावा: टोल फ्री क्रमांक: १०६४, व्हॉट्सॲप हेल्पलाईन: ७०३८३९१०६४, दूरध्वनी क्रमांक: ०२३५२-२२२८९३
लाच देण्यास आणि घेण्यास स्पष्ट नकार देऊन नागरिकांनी या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, जेणेकरून एक स्वच्छ, गतिमान आणि पारदर्शक महाराष्ट्र घडवणे शक्य होईल, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.









