लसीचा तुटवडा; नवीन 1100 डोस प्राप्त, दुसर्या टप्प्यासाठी राखीव
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना लसीचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यामुळे नियमित लसीकरण बंद करण्यात आले आहे. आरोग्य विभागाला अकराशे नवीन डोस मिळाले आहेत. मात्र ते दुसर्या टप्प्यातील लोकांना देण्यासाठी ठेवले आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांना काही दिवस वाट पहावी लागणार आहे. आरोग्य विभागाकडून याला दुजोरा देण्यात आला.
कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणावर परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा भासत आहे. आरोग्य विभागाला काल (ता. 7) अकराशे नवीन डोस कोल्हापूर येथून जिल्ह्याला प्राप्त झाले. मात्र हे डोस दुसर्या टप्प्यासाठी राखीव ठेवले आहेत. सध्या 50 केंद्रात लसीकरण हे लसीकरण सुरू होत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पावणे दोनशेच्यावर रुग्ण काल जिल्ह्यात सापडले. सुरक्षेसाठी लसीकरण मोहीम वेगाने व्हावी यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेने प्रत्येक सदस्यांनी आपापल्या गटातील गावांमध्ये जाऊन सरपंच, ग्रामसेवकांमार्फत लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन केले जात आहे. मात्र आरोग्य विभाग कात्रीत सापडला आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे लसीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला नियमीत लसीकरणाची मोहिम सध्यातरी बंद करावी लागली आहे. दोन दिवस पुरेल एवढीच लस शिल्लक आहे. कोल्हापूर येथून जिल्ह्यासाठी लसीचा साठा मिळतो. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे दीडशे डोस शिल्लक होते. त्यात अकराशे आणखी डोस आल्याने बाराशे डोस शिल्लक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 80 हजार दरम्यान लोकांना लस दिली गेली आहे. नवीन डोस दोन दिवसात जिल्ह्याला मिळणार आहेत. ते प्राप्त झाल्यानंतर नियमित लसीकरण होणार आहे. रेमडिसिव्हर इंजेक्शनचा साठाही 10 ते 12 दिवस पुरेल एवढा आहे.