जिल्ह्यातील एक हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या तयारीत

रत्नागिरी:- जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या सहाव्या टप्प्यात सुमारे 1 हजार शिक्षकांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील संवर्ग 1 व 2 मधील सुमारे 234 जणांच्या कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली. येत्या दोन दिवसात बदली पात्र शिक्षकांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र त्यांना नवनियुक्ती शिक्षक आल्याशिवाय सोडण्यात येणार नसल्याचे नाही. सध्या प्रक्रिया पुर्ण करून ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

गतवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पाच टप्प्यात घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे साडेसातशेहून अधिक शिक्षक परजिल्ह्यातील शाळांमध्ये रुजू झाले. त्याला ठाकरे सेनेसह विरोधी पक्षांकडून कडाडून विरोध झाला होता; परंतु नवीन भरतीसाठी रिक्त पदे निश्‍चित होणे आवश्यक असल्याचे कारण पुढे करत आंतर जिल्हा बदल्यांची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील रिक्त पदांची संख्या 2 हजारावर पोचली आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची वानवा झाली होती. विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शासनाने कंत्राटी तत्त्वावर नऊ हजार रुपये मानधनावर काही शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नियमित कारभार सुरु असला तरीही गुणवत्तेत भर पडणे अशक्य आहे. ही परिस्थिती असतानाच शासनाने सहाव्या टप्प्यात उर्वरित शिक्षकांसाठी बदली पोर्टल सुरु केले होते. त्यामध्ये सुमारे 1 हजार शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील संवर्ग 1 मधील माजी सैनिक, आजारी, विधवा, परितक्त्या आणि संवर्ग 2 मधील पति-पत्नी एकत्रीकरणाचे 234 जणांची कागदपत्रे पडताळणी बुधवारी (ता. 20) जिल्हापरिषदेत झाली. शासनाकडून आलेल्या वेळापत्रकानुसार सर्वसाधारणसह उर्वरित दोन संवर्गातील बदल्यांच्या याद्या दोन दिवसात जाहीर होणार आहेत. त्यामध्ये किती शिक्षक परजिल्ह्यात जाणार हे निश्‍चित होईल. जिल्हापरिषदेच्या पावणेतिन हजार शाळांमध्ये 6 हजार 900 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 2 हजार पदे रिक्त आहेत. नव्याने एक हजार शिक्षक परजिल्ह्यात गेले तर रिक्त पदांची संख्या वाढणार आहे. सुदैवाने ही प्रक्रिया पुर्ण होणार असली तरीही बदली झालेल्यांना नवीन शिक्षक येईपर्यंत जिल्ह्यातच रहावे लागणार आहे.