जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद करा; जिल्हाधिकारी यांचे आदेश

रत्नागिरी:- जिल्ह्यात आठवडा बाजार सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आले नसताना आठवडा बाजार सुरू करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परवानगी न घेता सुरू करण्यात आलेले आठवडा बाजार तात्काळ बंद करा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात रत्नागिरीतील आठवडी बाजार सुरु करण्याबाबत निर्बंध कायम होते असे म्हटले आहे. शासनाकडील वेळोवेळीच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने काही निबंध शिथील करण्यात आले तर काही निर्बंध वाढविण्यात आले होते.
 

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ झालेली असून ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे अधिक धोका निर्माण झाला आहे. त्या धर्तीवर शासनाने अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ होऊ नये व ओमिक्रॉन व्हेरीयंटचा प्रसार होऊ नये याकरीता अधिकची काळजी म्हणून कोणतीही पूर्व परवानगी न घेता सुरू करण्यात आलेले आठवडा बाजार बंद करावे असे आदेश  जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. शहरात मुख्यअधिकारी तर ग्रामीण भागात गट विकास अधिकारी यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.